JEE चा निकाल नुकताच लागला असून त्याची पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान या परीक्षेच्या निकालाबाबत एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. JEE च्या मुख्य परीक्षेत १०० पैकी केवळ १ जण पास होतो. यामुळे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी असणारी सर्व पदे भरली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा मुख्य परीक्षेसाठी दोन तृतीयांश विद्यार्थी घटले आहेत. मागील वर्षीही ५०,४५५ विद्यार्थ्यांपैकी १८,१३८ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत यश मिळाले होते. विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण कमी होण्याबद्दल आयआयटी रुरकीचे अध्यक्ष एम.एल. शर्मा यांना विचारले असता ते म्हणाले, या परीक्षेसाठीचा कटऑफ आधीच ठरवलेला असतो. आयआयटीला मिळालेल्या माहितीनुसार, फार कमी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात १० टक्के मिळाले असून एकूण ३५ टक्के मिळाले आहेत.

आपल्याकडे सगळ्या आयआयटी मिळून १.६ पटीने जास्त जागा उपलब्ध आहेत असे आयआयटी कानपूरचे अध्यक्ष प्राध्यापक शलाभ एस यांनी सांगितले. यावर्षी सर्व आयआयटी मिळून ११,२७९ जागा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक विद्यार्थी आपल्याला हवे ते आयआयटी सेंटर किंवा हवा तो कोर्स मिळाला नाही तर हा पर्याय सोडून देतात. त्यामुळे यंदा तरी आयआयटीमधील सर्व जागा भरणार का याबाबत तज्ञांकडून संशय व्यक्त कऱण्यात येत आहे.

आयआयटी आणि इतर काही राष्ट्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स घेण्यात येते. देशातून पहिल्या आलेल्या प्रणव गोयल याला ३६० पैकी ३३७ गुण आहेत. ऋषी अगरवाल हा राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आठव्या स्थानावर आहे. देशात मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारख ही ३१८ गुण मिळवून प्रथम आली असून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ती सहाव्या स्थानावर आहे देशभरात २० मे रोजी ही परीक्षा झाली होती. यंदा JEE मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेले साधारण १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. JEE Advance परीक्षेत ३५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरवण्याचा निर्णय गेल्या वर्षीपासून घेण्यात आला. त्यानुसार सामाईक प्रवेश यादीत ३६० पैकी १२६ गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरले.