बँकांचे हजारो कोटी रूपये थकवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात निघून गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर सडकून टीका केली. मल्ल्या ९००० कोटी बुडवून देशाबाहेर कसे काय गेले, असा सवाल जेटली यांना विचारण्यात आला होता. मात्र, त्याबद्दल बोलताना जेटलींनी लांबलचक भाषण दिले, पण उत्तर काही दिले नाही, असे राहुल यांनी म्हटले. मल्ल्या बँकांचे एवढे पैसे बुडवून पळून गेलेच कसे , याचे उत्तर मोदी किंवा जेटली यांना अजूनपर्यंत देता आलेले नाही. ते परदेशातील काळा पैसा देशात परत आणण्याच्या बाता करतात, मग मल्ल्यांबाबत हे सगळे कसे घडले, असा सवाल राहुल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
राज्यसभेतही या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ माजला. मल्ल्या यशस्वीपणे देशाबाहेर जाण्यासाठी सरकारच जबाबादार असून हाती न सापडायला विजय मल्ल्या म्हणजे सुई नव्हे, असा खोचक टोला काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी सरकारला लगावला. अगदी एक किलोमीटर अंतरावरूनही तुम्ही त्यांना ओळखू शकता. सरकारने त्यांना वेळीच अटक का केली नाही, त्यांचा पासपोर्ट जप्त का केला नाही, असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला भंडावून सोडले.