पाकिस्तानमधील अबोटाबाद शहरात एकाकीपणे राहावे लागत असल्याने ओसामा निराश झाला होता आणि अमेरिकन कमांडोंनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या काही महिने आधीच त्याची पाकिस्तान सोडून जाण्याची इच्छा होती, अशी माहिती आता मिळाली आहे.
आपण येथून दुसरीकडे हलण्याची वेळ आली आहे, असे सीआयएने ओसामाचा शोध लावून त्याला ठार मारण्याच्या काही महिने आधीच त्याने लिहून ठेवले होते. एकांतवासात राहिल्यामुळे तीव्र निराशा आली असल्याचे एका पत्रात नमूद करून त्याने आपण येथून जायला हवे, असा विचार त्याने व्यक्त केला होता.
पाकिस्तानातील ज्या दोन बंधूंनी ओसामाला आश्रय दिला होता आणि त्याचे बाह्य़ जगाशी संबंध तोडून टाकले होते, त्यांचा उल्लेख करून ‘मला त्यांना सोडून जावे लागेल असे मला वाटते’, असे लादेनने लिहिले होते.