येत्या काळात भारताला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणणं हे मोदी सरकारचं लक्ष्य आहे असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. उत्तराखंड जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची अर्थव्यवस्था २०१३ मध्ये ९ व्या स्थानावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या पाच वर्षांमध्ये ती पाचव्या क्रमांकावर आणली असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या घडीला असे अनेक विकसनीशल देश आहेत ज्यांना करोना नावाच्या संकटाचा फटका बसला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे ही परिस्थिती हाताळली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचं संकट हे एक आव्हान म्हणून स्वीकारलं. या आव्हानाशी लढा देताना जी पावलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलली आहेत त्याचं कौतुक फक्त भारतालाच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेला म्हणजेच WHO लाही आहे असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.