नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमचं सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. नितीन गडकरी यांनी एएनआयला मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी जर आपल्याला सांगितलं तर शेतकऱ्यांसोबत चर्चा करु असंही म्हटलं आहे.

“सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन,” असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

“जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतकऱ्यांविरोधात काही केलेलं नाही असं सांगताना नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावरुन रिलायन्सचे गंभीर आरोप; एअरटेल आणि VI वर कारवाईची मागणी

“मी विदर्भातला आहे, तिथे १० हजार गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्द्याचं राजकारण करता कामा नये. शेतकरी, शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर बदल करण्यास तयार आहोत,” असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- “शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलंय”

नितीन गडकरी यांनी यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोनलावरही भाष्य केलं. “मला वाटत नाही अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात काही केलेलं नाही. आपलं धान्य मंडी, व्यापारी किंवा अन्य कुठेही विकणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.