सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही जामिनावर फिरत आहेत, आज हे दोघे मला प्रामाणिकपणा शिकवत आहेत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आई आणि मुलगा कसेबसे जामिनावर मुक्त आहेत. नोटाबंदीमुळे त्यांच्या बनावट कंपन्यांना आळा बसला, त्याचमुळे या दोघांना जामिनावर फिरावे लागते आहे. अशात हे दोघे मला प्रामाणिकपणा शिकवत आहेत. आधी स्वतः काय केले आहे ते पाहा असा खोचक सल्लाही मोदी यांनी दिला.

छत्तीसगडमध्ये १८ जागांसाठी मतदान होते आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार सुरु आहे. याच टप्प्यासाठी बिलासपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी कठोर शब्दात काँग्रेसवर निशाणा साधला. मी अनेक वर्षे बिलासपूरमध्ये काम केले. छत्तीसगड हे भारतासाठी धान्याचे कोठार आहे. इथे संत कबीर यांना मानणारे लोक आहेत.

देशातल्या विरोधकांना अजूनही भाजपाचा सामना कसा करायचा हे समजलेलेच नाही. आम्ही विकासावर भर देतो आहोत. आम्हाला देशातून जातीभेद नष्ट करायचा आहे. तुम्ही सगळेजण या विकासाचे साक्षीदार आहात अशात काँग्रेसला मात्र आमच्यावर टीका करण्यातच रस आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भाजपाचे राजकारण गरीब माणसाच्या झोपडीपासून सुरु होते आहे त्याचा विकास कसा होईल यावर आम्ही भर देत राजकारण आणि देशाचा विकास करत आहोत. काँग्रेसचे राजकारण मात्र एकाच परिवारापुरते मर्यादित आहे. पंतप्रधान राजीव गांधी म्हटले होते की सरकारी मदतीतून जेव्हा गरीबांना मदत करण्यासाठी एक रुपया येतो तेव्हा त्यातले पंधरा पैसेच गरीबांपर्यंत पोहचतात. मग उरलेले ८५ पैसे कुठे जातात? नोटाबंदीच्या कठोर निर्णयामुळेच असेच पैसे बाहेर आले असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.