पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देणारं भाषण केलं. आपल्या भाषणामध्ये मोदींनी करोनाविरुद्ध भारताने दिलेला लढा, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदलेली सकारात्मक प्रतिमा, कृषी कायदे, काँग्रेसकडून कृषी कायद्यांना होणारा विरोध, सीमेवरील तणाव अशा अनेक विषयांवर भाष्य करत सरकारची भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये सभासदांनी मांडलेले मुद्दे आणि झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी कृषी कायद्यांना होणारा विरोध हा आपल्याच भूमिकेपासून विरोधक पळत असल्याचा प्रयत्न असल्याचा टोला लगावत जुने संदर्भ देत विरोधकांचा समाचार घेतला. आपल्या भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या ठरवली जाणारी ध्येय आणि धोरणं ही तत्कालीन नसून दीर्घकालीन असल्याचं म्हटलं आहे. हे सांगताना मोदींनी व्हिजन २०४७ चा ही दाखला दिला आहे. नक्की वाचा >> करोनाविरुद्धची लढाई जिकंण्याचं श्रेय कोणत्याही सरकारला किंवा व्यक्तीला जात नसलं तरी…; पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देताना सव्वा तासांचे भाषण केलं. या भाषणाचा शेवट त्यांनी वेदांमधील एक श्लोक सांगत केला. या श्लोकामधून त्यांनी कोट्यावधी भारतीयांच्या अशा, आकांक्षा आणि इच्छा आपल्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. भाषणाच्या शेवटच्या मिनिटांमध्ये मोदींनी सर्वांचे आभार मानले. तसेच नवीन सुधारणांच्या आधारे १३० कोटी भारतीय असणारा आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले. "सर्वांचे आभार मानतो. १३० कोटींहून अधिक लोकसंख्या असणारा देश सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहे. १३० कोटी लोकांची स्वप्नं, भविष्य आणि आकांशा या देशाच्या उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आज देशामध्ये जी ध्येय आणि धोरणं ठरवली जात आहेत ती तत्कालीन नसून दीर्घकालीन आहेत," असं मोदी म्हणाले. नक्की वाचा >> “तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावं लागत आहे”; मोदींचा काँग्रेसचा टोला सध्या ठरवली जाणारी ध्येय आणि धोरणं ही पुढील अनेक दशकांमध्ये भारताची प्रगती सुनिश्चित करणारी आहेत असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. २०४७ साली भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्ष साजरी करत असेल तेव्हा देशाला नवीन उंचीवर नेऊ ठेवण्यासाठीची जी स्वप्नं आहेत त्याचा पाया आम्ही उभारत आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यावं, असं मोदींनी म्हटलं. हे काम पूर्ण कऱण्यामध्ये आम्ही नक्कीच यश मिळवू असा माझा विश्वास आहे," असं म्हणत मोदींनी आपलं भाषण संपवलं.