नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच करोनाच्या रुग्णांमध्ये २० हजारहून अधिक वाढ झाली तर, तितकेच रुग्ण बरे झाले. २० हजार ९०३ रुग्णांची भर पडून एकूण करोना रुग्ण ६ लाख ५२ हजार ५४४ झाले आहेत व २० हजार ३२ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ७९ हजार ८९२ इतकी झाली आहे. ३०७ मृत्यूंची भर पडल्याने एकूण मृत्यू १८ हजार २१३ झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले असून २ लाख २७ हजार ४३९ रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४१ हजार ५७६ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण ९२ लाख ९७ हजार ७४९ चाचण्या करण्यात आल्या.

गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात ६३२८, तमिळनाडूमध्ये ४३४३, दिल्ली २३७३ रुग्णांची वाढ झाली. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या ९० हजारांहून अधिक झाली असून ती ९२ हजार १७५ वर पोहोचली आहे. राजधानीतील रुग्ण वाढ लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. दिल्लीत रक्तद्रव बँकही सुरू करण्यात आली आहे.