एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना भारतमाता की जय म्हणायचं नसेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानातून निवडणूक लढवावी असा खोचक सल्ला भाजपाचे नेते राजा सिंग यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसी यांनी मी भारतमाता की जय म्हणणार नाही आणि वंदे मातरमही म्हणणार नाही असे म्हटले होते त्यावर टीका करत भाजपा नते राजा सिंग यांनी ओवेसींवर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात बऱ्याचदा उल्लेख केला आहे की मी भारतमाता की जय असे म्हणणार नाही तसेच वंदे मातरमही म्हणणार नाही. भारतमाता की जय इथे म्हणायचं नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का? तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर खुशाल देश सोडून चालते व्हा, पाकिस्तानात जा असा सल्ला राजा सिंग यांनी दिला आहे.

एवढंच नाही तर राजा सिंग यांनी असेही आव्हान दिले आहे की जी व्यक्ती भारतमाता की जय म्हणणार नाही किंवा वंदे मातरम म्हणणार नाही अशा व्यक्तीला तेलंगणमधून बाहेर हाकलून देऊ. तेलंगणमध्ये भाजपाची सत्ता आली की आम्ही अशा सगळ्या लोकांना हाकलून देऊ असेही त्यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर तेलंगणमध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे ठेवू. एवढंच नाही हैदराबादच्या ज्या भागाला मुघल आणि निजामाची नावं आहेत ती बदलण्यात येतील असेही सिंग यांनी म्हटले आहे. आता या टीकेला ओवेसी कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.