केंद्र सरकार रमजान ईद झाल्यावर दहशतवाद्यांविरोधात स्थगित करण्यात आलेली मोहीम सुरु करायची की नाही याबाबत विचाराधीन आहे. ही मोहीम स्थगित असतानाच एका सैनिकाला एका पत्रकाराला ठार करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अमरनाथ यात्रेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या हल्ल्याच्या कटामागे पाकिस्तान आहे असेही समजते आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्यासाठी कट रचत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते आहे.

रमजानच्या महिन्यात दहशतवाद्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या मोहिमांना स्थगिती देण्याचा नेमका काय परिणाम झाला याबाबत गुरुवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत अमरनाथ यात्रेबाबत आणि या यात्रेची सुरक्षा वाढवण्यासंबंधीही विचार विनिमय झाला. अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट आहे अशात मेहबुबा मुफ्ती सरकारने केंद्राकडे २२ हजार अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करावी अशीही मागणी केली आहे.

४५ मिनिटे चाललेल्या बैठकीत दहशतवाद्यांविरोधात पुन्हा कारवाई सुरु करायची की नाही याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी ही मोहीम सुरु करायची की स्थगितच ठेवायची यावर विचार सुरु आहे. अशात सुरक्षा दलांवर आणि अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंवर मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दहशत पसरावी म्हणून दहशतवादी भाविकांवर हल्ला करून त्यांना ठार करण्याची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. त्यामुळेच अमरनाथच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.