भारतीय वायूसेनेच्या विमानांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंगळवारी पहाटे बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले जाते. अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. या हल्ल्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा तळ नष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी तर दिल्लीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकेल, अशी दर्पोक्ती केली आहे.

शाहबाज शरीफने पाकिस्तानी जियो या वृत्त वाहिनीशी बोलताना पाकिस्तानी झेंडा आता दिल्लीत फडकेल, असे म्हटले. याचदरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताने हवाई सीमेचे उल्लंघन केले असून इस्लामाबादला उत्तर देण्याचा अधिकार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले. दरम्यान, भारतीय वायूसेनेच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

पीओकेतील दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानी सीमेवर भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. नियंत्रण रेषेपासून ते आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय वायूसेनेच्या वतीने हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही कृतीला उत्तर देण्यासाठी तयार आहे.