पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादी गटांवर तत्काळ कारवाई करावी असा सल्ला ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या एअर स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारिस पायन यांनी हा सल्ला दिला आहे.


पायन म्हणाल्या, दहशतवादी गटांबरोबर जैश-ए-महोम्मदवरही पाकिस्तानने कारवाई करायला हवी कारण त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी भारतातील पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. त्याचबरोबर मुलतत्ववादी गटांना पाकिस्तानने आपल्या हद्दीत थारा देऊ नये असेही पायन यांनी म्हटले आहे.


पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांसंदर्भात ऑस्ट्रेलिया चिंतेत आहे. ऑस्ट्रेलियाने या हल्ल्याचा तीव्र निषेधही नोंदवला आहे. दोन्ही देशांनी अशा स्वरुपाच्या कारवाया टाळाव्यात दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा करावी. त्यांच्यातील वाद त्यांनी शांततेत सोडवावेत असेही पायन यांनी म्हटले आहे.