चर्चेच्या विषयांत काश्मीरच्या मुद्दय़ाचा समावेश करण्यात आला नाही, तर भारतासमवेत कोणत्याही चर्चेला सुरुवात केली जाणार नाही, असे तुणतुणे पाकिस्तानने पुन्हा एकदा वाजविले आहे. भारत आणि पाकिस्तानने शांतता चर्चेला सुरुवात करावी, अशी सूचना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी केली असतानाही पाकिस्तानने हटवादी भूमिका सोडलेली नाही.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिझ आणि जॉन केरी यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काश्मिरी नेत्यांसमवेत करण्यात आलेल्या चर्चेचे कारण देऊन भारताने गेल्या वर्षी नियोजित चर्चा रद्द केली, त्यावरून भारताची या प्रश्नावर चर्चा करण्याची इच्छा नाही हे स्पष्ट होते, असा कांगावाही पाकिस्तानने केला आहे.
भारत आणि पाकिस्तानने पुढे येऊन चर्चेला सुरुवात करावी, याचा पाठपुरावा अमेरिका सातत्याने करील, असे केरी यांनी स्पष्ट केले. तरीही काश्मीरच्या मुद्दय़ाविना पाकिस्तान भारताशी चर्चा करणार नाही, असे अझिझ यांनी स्पष्ट केले.