सुरक्षा मंडळाने काश्मीरबाबत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करताना काश्मिरी लोकांचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करावा, कारण दक्षिण आशियात शांतता व स्थिरता नांदण्यासाठी काश्मीर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, असे मत पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना व्यक्त केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या तिसऱ्या समितीची स्वयंनिर्णयावरची बैठक नुकतीच झाली; त्यात मलिहा लोधी यांनी सांगितले की, दक्षिण आशियात काश्मीरचा प्रश्न फार जुना आहे व त्यासाठी वैश्विक मान्यताप्राप्त तत्त्वांचा अवलंब करून हा प्रश्न सोडवावा.
काश्मिरी महिला व मुले तसेच पुरूष हालअपेष्टांना सामोरे जात आहेत. संयुक्त राष्ट्रांना सत्तर वर्षे पूर्ण होत असताना केवळ चार शब्द बोलून भागणार नाही, तर काश्मीरच्या लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला पाहिजे, हे आश्वासन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळानेच दिले होते.
लोधी म्हणाल्या की, सुरक्षा मंडळांच्या ठरावांनुसार काश्मीरचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली निष्पक्षपणे सार्वमत घेणे गरजेचे आहे. हे ठराव संमत करून अनेक दशके झाली तरी तेथील लोकांना हा मूलभूत अधिकार मिळत नाही, ही कायदा व नैतिकतेची शोकांतिका आहे.