भारताने पाकिस्तानला सातत्याने धमक्या देण्याचे सत्र कायम ठेवल्यास पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देऊ शकतो, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. एका खासगी दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही दर्पोक्ती केली आहे. भारत सातत्याने धमक्या देत आहे त्यामुळे सर्वप्रथम हे जाणून घेतले पाहिजे की पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो, आमचा देश लहान नाही, लक्षात राहील असे प्रत्युत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे याचे भान ठेवा, असे मुशर्रफ यांनी ‘समा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी की होऊ नये या बाबत मतभेद निर्माण झाले असतानाच मुशर्रफ यांनी वरील दर्पोक्ती केली आहे.