भारतच दहशतवाद पसरवत आहे असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. आम्ही स्वत: दहशतवादाविरुद्ध लढत असून कसलाही विचार न करता भारताकडून पाकिस्तानवर आरोप लावले जात असल्याचे पाकिस्तानी लष्कराने आज घेतलेल्या एका पत्रकार परिषद  म्हटले आहे.

आम्ही मागील बऱ्याच काळापासून दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. आमचा शेजारी देश असणाऱ्या भारताकडूनच दहशतवाद पसरवला जात आहे आणि कुलभूषण जाधव हा याच भारतीय दहशतवादाचा चेहरा असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. तसेच दरवेळेस निवडणुका आल्यावर भारतामध्ये दहशतवादी हल्ले कसे होतात असा सवाल पाकिस्तानने विचारला आहे. १९४७ पासून काश्मीरींवर भारत अत्याचार करत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले असून उलट भारतानेच बांगलादेश निर्मितीच्या वेळेस दहशतवाद केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या हल्ल्याशी आमचा काहीच संबंध नसून भारत आमच्यावर खोटे आरोप करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर कोणताही विचार न करता पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत असं पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. पुलवामा हे नियंत्रणरेषेपासून खूप दूर, हल्ला करणारा तरुण भारतीय होता, हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी भारतीय होती, दारुगोळा सर्व काही काश्मिरमधील होते, मग या हल्ल्याशी पाकिस्तानचा काय संबंध आहे असा सवाल पाकिस्तानने केला आहे. पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानला काहीच फायदा नसल्याचे सांगतानाच भारताकडून पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे.

पाकिस्तान बदलतोय, एक नवा विचार आज पाकिस्तामध्ये रुझताना दिसत आहे. आमच्या लोकांनी आणि देशाने रक्तरंजीत संघर्षानंतर आजचा पाकिस्तान घडवला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील अल कायदा दहशवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली. आम्ही शांततेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. आम्ही या प्रवासात चुकांमधून शिकलो आहोत. आता मात्र आम्ही चुका करणार नाही. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही आधी विचार केला मग चौकशी केली आणि त्यानंतरच भारताला उत्तर दिल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.

एका जबाबदार देशाचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी भारताला पाकिस्तानने या आधी कधीही दिली नव्हती अशी ऑफर दिल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. हवी ती चौकशी करायला आम्ही तयार आहोत आम्हाला पुरावे द्या असं पंतप्रधान म्हणाले. तुमच्या दबावाखाली नाही तर आम्ही आमच्या भल्यासाठी कठोर कारवाई करु असे आश्वासनही पंतप्रधान इम्रान खान यांनी दिल्याचे पाकिस्तानी लष्कराने सांगितले आहे.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानमधील युद्धाच्या चर्चांना सुरुवात झाली असतानाच पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.