पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या इशाऱ्यामुळे पाकिस्तानातने सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानला या हल्ल्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राइकसारखं जोरदार प्रत्युत्तर केलं जाण्याची भीती आहे. म्हणूनच या तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने दहशतावदावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सुत्रधार दहशतवादी हाफिज सईद याच्या संघटनेवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हाफिज सईदची संघटना ‘जमात-उद-दावा’ आणि त्याला रसद पुरवणारी संस्था ‘फलाह-ए-इन्सानियत’ फाउंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. गुरूवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC)ची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये हाफिजच्या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान वृत्तमानपत्र डॉनने पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. मात्र पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा कोणत्याही प्रकारचा हात नाही, असा दावा सुरक्षा परिषदेने केला आहे.

हाफिज सईद याचच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटनांचे ५० हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक आणि शेकडो कार्यकर्ते कार्यरत आहेत. जमात-उद-दावा लष्कर-ए-तोयबाची प्रमुख संघटना आहे. अमेरिकेने जून २०१४ मध्ये या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केले होते. हाफिज सईद पाकिस्तानात त्याच्या घरी स्थानबद्ध होता, मात्र नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. हाफिज सईदला भारताच्या हवाली करावे अशी भारताची मागणी आहे.

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्याची कल्पना, कट, अंमलबजावणी भारताच्या भूमीवर रचण्यात आला, असेही एनएससीने सांगितले. भारताने जर आक्रमक कारवाई केली तर पूर्ण शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करण्याचे आदेश पंतप्रधान इम्रान खान यांनी सैन्याला दिले आहेत.