भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर सीमारेषेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्यांनी तो हाणून पाडला. परिस्थिती तणावपूर्ण असून भारत आणि पाकिस्तानमधील महत्त्वाची विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर युद्धाची भाषा करणारं पाकिस्तान नरमलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सैन्याकडून भारताला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

भारताने केलेल्या हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने त्यांची तीन विमानं भारतीय हद्दीत आणली होती. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे. विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे.

मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे.