पाकिस्तान हा आपला शेजारी असून भारतालाही त्यांच्याबरोबर चांगले संबंध राखायचे आहेत. मात्र, त्यासाठी पाकिस्तानकडूनही काही पाऊले उचलली गेली पाहिजेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यासाठी सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने होणारे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रकार थांबणे गरजेचे असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला नवाज शरीफ यांना आमंत्रित करून भारताला पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची मनापासून इच्छा असल्याचा संदेश दिला होता. मात्र, तरीही पाकिस्तानकडून सातत्याने सीमारेषेवरील भारतीय चौक्यांवर अकारण गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय लष्कराकडून वारंवार पराभूत होऊनही पाकिस्तानचे हे प्रकार सुरूच असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच भारतीय लष्कराला पाकच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.