अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी गेल्याकाही दिवसांपासून रोज नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आता याप्रकरणी शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष सईद वसिम रिझवी यांनी एक नवाच खुलासा केला आहे. राम मंदिरप्रश्नी पाकिस्तान अडथळा आणत असल्याचा आरोप रिझवी यांनी केला असून त्याचाच एक भाग म्हणून लष्कर ए तोएबाने २००५ मध्ये राम जन्मभूमीवर हल्ला केला होता, असेही त्यांनी म्हटले.

माध्यमांशी बोलताना रिझवी यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून या प्रकरणात लक्ष घातले जात असून ते मुद्दामहून यात अडथळे आणत आहेत. वर्ष २००५ मध्ये लष्कर ए तोएबाने त्यामुळेच राम जन्मभूमीवर हल्ला केला होता, असे ते म्हणाले. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर मध्यस्थीसाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला असतानाच रिझवी यांनी नवीन तोडगा सुचवला होता. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर आणि मशीद लखनऊत बांधावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला होता.

अयोध्येत राम मंदिर आणि लखनौत मशीद बांधा : शिया वक्फ बोर्ड

रिझवी यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला राम मंदिर वादाविषयी प्रतिक्रिया दिली होती. आम्ही अन्य पक्षकारांशी चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानुसार अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असे त्यांनी सांगितले होते. भारतात शांतता आणि बंधुत्वाची भावना कायम राहावी, यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी सांगितले होते.