भारत आणि पाकिस्तामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. दरम्यान पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटं बोललं असल्याचा आरोप भारताकडून कऱण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदसंबंधी खोटी माहिती दिली. याशिवाय भारताचे दोन वैमानिक आपल्या ताब्यात असल्याची खोटी माहिती दिली असल्याचं भारताने सांगितलं आहे.

भारताने आपण कर्तारपूरवर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र ज्याप्रमाणे विमानांच्या धावपट्ट्या आणि समझौता एक्स्प्रेस बंद केली त्याप्रमाणे पाकिस्तानने याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही प्रयत्न करत असताना पाकिस्तान मात्र युद्ध परिस्थिती निर्माण करत आहेत असं भारताने म्हटलं आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सुखरुप सोडवण्यासाठी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या पायलटला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेकडे भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने तातडीने भारतामध्ये पाठवावे. अभिनंदन प्रकरणावरुन कोणतीही देवाणघेवाण केली जाणार नाही. या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होईल आणि चर्चेचा पत्ता आपल्या हातात आहे असं पाकिस्तानला वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक दिली जावी अशी भारताची अपेक्षा असल्याची माहिती सुत्रांनी ‘एएनआयला’ दिली आहे.