भारताकडे २०१४ पर्यंत ७५ ते १२५ अण्वस्त्रे तयार करता येतील एवढे प्लुटोनियम होते, असे अमेरिकेतील एका वैचारिक गटाने म्हटले आहे. भारताकडे पाकिस्तानपेक्षा खूपच कमी अण्वस्त्रे आहेत असेही सांगण्यात आले.
भारत हा जगातील विकसनशील राष्ट्रात मोठा आण्विक कार्यक्रम असलेला देश असून भारताकडे अण्वस्त्रे बनवण्यासाठी प्लुटोनियमचा पुरेसा साठा होता. ११० ते १७५ अण्वस्त्रे तयार करण्यास उपयुक्त प्लुटोनियम म्हणजे सरासरी १३८ अण्वस्त्रे तयार करण्याइतकी क्षमता भारताकडे गेल्यावर्षी होती, पण अण्वस्त्रांची संख्या मात्र ७५ ते १२५ इतकी असू शकते. प्लुटोनियमचे जे साठे होते त्यातील सत्तर टक्के साठे अण्वस्त्रांसाठी वापरले गेले, सगळ्या प्लुटोनियमची अण्वस्त्रे तयार केलेली नाहीत. त्यामुळे अंदाजे ९७ अण्वस्त्रे भारताकडे असावीत पण तो आकडा ७७ ते १२३ दरम्यान असू शकतो, कदाचित ही संख्या शंभरही असू शकेल, असे डेव्हिड अल्ब्राईट व सेरेन केलहर -व्हेरगानटिनी यांनी सांगितले आहे.
विशेष करून अल्ब्राईट यांनी भारत विरोधी मोहीम काँग्रेस व विचारवंत गटात राबवली असून भारत-अमेरिका अणुकरारास त्यांचा विरोध होता.
इंडिया स्टॉक्स ऑफ सिव्हील अँड मिलिटरी प्लुटोनियम अँड हायली एनरिचड युरेनियम एन्ड २०१४ या अहवालात म्हटले आहे की, भारत हा विकसनशील देशातील सर्वात मोठा अणुकार्यक्रम असलेला देश असून नव्या अंदाजानुसार भारताकडे १००-२०० किलो अण्वस्त्रयोग्य युरेनियम होते. भारताविरोधात तसे कुठले पुरावे मात्र नाहीत, त्यामुळे १००-२०० किलो युरेनियम आहे हा केवळ अंदाजच आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताकडे अण्वस्त्रांसाठी पुरेसे प्लुटोनियम होते व युरेनियमही होते. प्लुटोनियम व युरेयिनमचा भारताकडे किती साठा होता यावरून अण्वस्त्रांची संख्या काढता येते. छोटय़ा अणुभट्टय़ात भारत प्लुटोनियम तयार करतो. २०१४ अखेर भारताकडे संपृक्त युरेनियम प्रमाण किती होते याचा अंदाज या अहवालात आहे.