पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु आहे. त्याचवेळी पाकिस्तान गिलगिट-बालटिस्तान भागात सैन्याची तैनाती करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी चिनी लष्कराने अल बदर या दहशतवादी संघटनेबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या उत्तरेला गिलगिट बाल्टिस्तान भागात पाकिस्तानने तैनातीसाठी २० हजार अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत. भारताची कोंडी करायची. एकाचवेळी भारतावर दोन्ही बाजूंनी हल्ला करण्याची संधी कधी मिळते? पाकिस्तान त्या प्रतिक्षेत आहे असे सूत्रांनी सांगितले.

चीन आणि पाकिस्तानकडून असलेल्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी भारतीय लष्करी अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. चीनला मदत करण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या आयएसआयकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना आणखी खतपाणी घातले जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षित बॅटचे दहशतवादी पाठवले जाऊ शकतात.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली आहे. आतापर्यंत १२० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यात बहुतांश स्थानिक दहशतवादी होते. काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवाद्यांकरवी सुरक्षा दलांवर सुद्धा हल्ले घडवून आणू शकतो. भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये काल चुशुल येथे तब्बल दहा तास बैठक चालली. यामध्ये पूर्व लडाखमध्ये तणाव कसा कमी करायचा, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

कराची स्टॉक एक्सचेंज हल्ल्यासाठी पाकिस्तानने भारताला धरलं जबाबदार
दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचा हा आरोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य देशांना मान्य नाहीय. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून या हल्ल्यासंबंधी अजून कुठलेही वक्तव्य समोर आलेले नाही. यूएनएससीकडून पत्रक जारी करायला विलंब झाला आहे.