पाकिस्तानने सोमवारी त्यांच्या तुरुंगातील ४८ भारतीय मच्छीमारांची सुटका केली. यात १० अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी नुकताच पाकिस्तानचा दौरा केला होता, या वेळी झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचे आश्वासन कृष्णा यांना दिले होते, त्यानुसार सोमवारी ही कार्यवाही करण्यात आली. कराची येथील तुरुंगात असणाऱ्या या ४८ भारतीय मच्छीमारांना वाघा सीमारेषेजवळ सोडण्यात आले. हे सर्व मच्छीमार मंगळवारी भारतीय भूमीवर पाय ठेवतील. पाकिस्तानच्या तुरुंगात अद्याप ३२ मच्छीमार असून त्यांनाही लवकरच मुक्त करण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
आमच्याप्रमाणे भारतही सद्भावनेपोटी आमच्या मच्छीमारांची व अन्य नागरिकांची सुटका करेल, अशी आशा पाकिस्तानने व्यक्त केली. भारतीय तुरुंगात एकूण ४२८ पाकिस्तानी नागरिक असून त्यात ८५ मच्छीमारांचा समावेश आहे.