नवी दिल्ली : बलुचिस्तानातून जी व्यक्ती गायब होते तिची नंतर हत्या होते. यामागे पाकिस्तान आणि आयएसआयचा हात असल्याचा आरोप बलुचिस्तानातील कार्यकर्ते मामा कादीर बलुच यांनी केला आहे. तसेच पाकिस्तान दहशतवादाची फॅक्टरी चालवत असून हाफिज सईद आणि सैय्यद सलाउद्दीन या दहशतवाद्यांना पाकनेच जन्माला घातल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.


कादीर यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच इराणमधून कुलभूषण जाधवांचे अपहरण करण्यात आले होते. मोठे आर्थिक आमिष दाखवून मुल्ला उमरच्या माध्यमातून जाधव यांचे अपहरण करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यापूर्वीही त्यांनी हा आरोप केला होता. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या जाधव यांना क्वेट्टामार्गे इस्लामाबादला नेण्यात आले होते. अनेक दबाव आणि अत्याचार केल्यानेच त्यांना पाकिस्तानच्या समर्थनार्थ निवेदन देण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.


कादीर यांनी दावा केला आहे की, पाकिस्तान सरकारकडे कुलभूषण जाधवांविरोधात कोणताच पुरावा नाही. ग्वादर भागात जाताना चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना देखील चार चेक पॉईंटवरुन जावे लागते. यावरुनच बाहेरुन आलेली कोणी व्यक्ती तेथे कशी वास्तव्यास असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तानकडे कुलभूषण जाधवांविरोधात कोणताही पुरावा नाही ते उगाचच हे प्रकरण चिघळवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.