इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (ओआयसी) पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची पाळी आली. पाकिस्तानने इस्लामोफोबियाच्या आरोपावरून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी भारताची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. मालदीव व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनं भारताची बाजू घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानने भारतावर इस्लामोफोबियाचा प्रचार केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. असं असलं तरी आयओसीमधील अनेक सदस्य देशांनी भारताचं समर्थन केलं आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत भारताच्या वाढत असलेल्या व्यापारी संबंधांशिवाय इस्लामिक देशांमध्ये भारताचं स्थान उत्तम होत असल्याचं दिसत आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारताचा मित्रदेश ओमाननंदेखील हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे भारताविरोधात पाकिस्ताननं केलेल्या आरोपांवर अन्य देशांनी आपल्या प्रतिक्रियाचं दिल्या नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घातल असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या एका ऑनलाइन बैठकीदरम्यान केला होता. परंतु मालदीवनं याचं खंडन करत भारत हा जगातिल सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, असं म्हटलं होतं. तसंच भारतात २० कोटीहून अधिक मुस्लिम वास्तव्य करत असून भारतावर असा आरोप करणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारचा आरोप दक्षिण आशियाई क्षेत्रात करणं हे धार्मिक एकतेसाठी घातक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

भारतानं सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांसारख्या देशांशी इस्लामिक राष्ट्रांशी आपले संबंध अधिक दृढ केले आहेत. या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कारानंही सन्मानित केलं आहे. पाकिस्ताननं दक्षिण आशियातील सर्व देशांसोबत मिळून काम करणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेत बदलही केला पाहिजे, असंही मालदीवनं म्हटलं होतं.