विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडल्यानंतर भारत आपल्यावर हल्ला करेल, ही भीती पाकिस्तानला वाटत होती. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजावा यांना घाम फुटला होता, त्यांचे पाय थरथरत होते. या भीतीपोटीच पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान यांची सुटका केली, असा दावा पाकिस्तानी खासदाराने केला. त्यानंतर आता माजी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“अभिनंदन वर्थमान यांना निश्चित परत आणू, असे मी त्यांच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी आपल्या लष्कराची भूमिका पूर्णपणे आक्रमक होती, म्हणूनच पाकिस्तानी खासदार आज हे म्हणतोय. त्यांच्या फॉरवर्ड ब्रिगेड पूर्णपणे उद्धवस्त करण्याच्या स्थितीमध्ये आम्ही होतो. त्यांना आमची क्षमता माहित आहे” असे बी.एस.धनोआ म्हणाले.

“पाकिस्तानवर मुत्सद्दी पातळीवरुन आणि राजकीय दबावही होता. त्याचबरोबर लष्करी दबावही तितकाच होता. सादीक यांनी जे सांगितले, जनरल बाजवा यांचे पाय थरथरत होते, वैगरे ते सर्व सैन्याच्या भूमिकेमुळे. लष्कर, नौदल आणि हवाई दल तिन्ही सैन्य दले पूर्णपणे आक्रमक होती” असे धनोआ म्हणाले. २७ फेब्रुवारीला त्यांनी आमच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले असते, तर आम्ही त्यांच्या सर्व फॉरवर्ड ब्रिगेडचं उद्धवस्त केल्या असत्या असे धनोआ यांनी सांगितले.