पाकिस्तानच्या लारकाना शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. नम्रिता चंदानी असे या मुलीचे नाव असून ती बिबी असिफा डेंटल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होती. सोमवारी कॉलेजच्या वसतिगृहाच्या खोलीमध्ये नम्रिता मृतावस्थेत आढळली. द्वेष भावनेतून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नम्रिताचे घर घोटकी तालुक्यातील मीरपूर माथीलो येथे आहे. तिच्या संशयास्पद मृत्यूनंतर साऱ्यांनी तिच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली. तर काही भारतीयांनी या मुद्द्यावरून पाकिस्तानवर टीका केली. या दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही या घटनेबाबत ट्विट केले. " तरूण आणि निरागस अशा नम्रिताच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे मला खूपच दु:ख झाले आहे. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि तिच्या मारेकऱ्यांना नक्कीच शासन केले जाईल असा मला विश्वास आहे. कोणत्याही विचारसरणीचा असला, तरी प्रत्येक पाकिस्तानी हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. देव तिच्या आत्म्यास शांती देवो", असे अख्तरने ट्विट केले आहे. Extremely sad & hurt sad reading about the suspicious death of young innocent girl, Nimrita Kumari. I hope the justice is served and the real culprits are found. My heart beats with every Pakistani no matter what faith he/she belongs to. Rest in Peace. #JusticeForNimrita pic.twitter.com/2nJMmpMRp8 — Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 17, 2019 या घटनेबाबत पोलीस म्हणाले की नम्रिताचा मृतदेह बिछान्यावर पडलेला होता. गळयाभोवती फास होता तसेच तिची खोली आतमधून बंद होती. नम्रिताने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबद्दल आताच काही बोलणे घाईचे होईल. शवविच्छेदनासाठी आम्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. कराचीहून नम्रिताचे आई-वडिलांच्या येण्याची पोलीस वाट पाहत आहेत. नम्रिताचे सहकारी तिला बोलवण्यासाठी तिच्या रुमवर गेले होते. त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला. वसतिगृहाच्या वॉचमनने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी नम्रिता बिछान्यावर पडलेली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटते पण शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मेडिकल कॉलेजच्या व्हाइस चान्सलर अनिला रेहमान म्हणाल्या. कुटुंबीय म्हणतात. आम्ही अल्पसंख्यांक असल्यामुळे आमच्या मुलीची हत्या करण्यात आली असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. नम्रिताची हत्या झाली आहे असा आरोप तिच्या भावाने प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना केला. माझ्या बहिणीकडे ओढणी असायची. तिच्या गळयावर जे व्रण आहेत ते केबलच्या वायरचे आहेत असे त्याने सांगितले. तिच्या शरीराच्या अन्य भागांवर जे व्रण दिसत आहेत, त्यावरुन कोणीतरी तिला पकडल्याचे दिसते. आम्ही अल्पसंख्यांक आहोत. आमच्यामागे उभे रहा, असे आवाहन नम्रिताच्या भावाने केले आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एक जानेवारी २०१७ रोजी सिंध विद्यापीठात शिकणारी नायला रिंद ही विद्यार्थिनी मृतावस्थेत सापडली होती. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.