पाकिस्तानी तालिबान्यांनी समोरासमोर वाटाघाटी कराव्यात, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी दहशतवादी हल्ले तातडीने थांबले पाहिजेत, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले.
तालिबान्यांनी वाटाघाटीची इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्हीही शांततेसाठी आणखी एक संधी घेण्यास तयार आहोत, असे शरीफ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीत सांगितले. दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून चालू शकत नसल्यामुळे तालिबान्यांनी दहशतवादी कृत्ये थांबविलीच पाहिजेत, असे शरीफ यांनी स्पष्ट केले. दहशतवादास पायबंद घालण्यासाठी सरकारने सर्व पक्षांना बरोबर घेतले असल्याची घोषणाही त्यांनी केली. दहशतवादाविरोधात सरकारने स्पष्ट रणनीती आखली असल्याचे शरीफ यांनी नमूद केले.
तालिबान्यांसमवेत शांतता चर्चा करण्यासाठी इरफान सिद्दिकी, रहिमुल्ला युसूफझाई, रुस्तम शाह मेहमंद व मेजर अमीर यांची एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा शरीफ यांनी केली.