गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा भारत विरोध वाढत असल्याचं दिसत आहे. नुकतंच त्यांनी भारताबद्दल एक चुकीचं आणि खोटं ट्विट केलं होतं. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचंही पहायला मिळालं. परंतु तोपर्यंत त्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कथितरित्या हिंसाचार करत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांनीही यावर ट्विट करत ते व्हिडीओ भारतातील नसल्याचं म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधादरम्यान भारतात पोलिसांचा हिंसाचार असं म्हणत त्यांनी तीन व्हिडीओ पोस्ट केले होते. भारतातील पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत असल्याचंही त्यांनी यात म्हटलं होतं. परंतु त्यांनी पोस्ट केलेले व्हिडीओ हे खोटे असल्याचं तेव्हा समोर आलं जेव्हा ते भारतातील नसून बांगलादेशील असल्याची माहिती मिळाली. तसंच ते व्हिडीओ २०१३ मधील असून बांगलादेशातील रॅपिड अॅक्शन बटालियन काही तरूणांना मारत असतानाचे होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनीही ट्विट करत ते व्हिडीओ भारतातील नसल्याचं सांगितलं. तसंच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनीदेखील यावर कठोर शब्दात निशाणा साधला. खोट्या बातम्या ट्विट करा. पकडले जा. ट्विट डिलिट करा आणि पुन्हा तेच काम करा अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनीदेखील पाकिस्तानकडून असे प्रकार वारंवार होत असल्याचं म्हटलं आहे.