पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार सध्या सत्तेतून बाहेर फेकलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या सीनेटच्या निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) वरिष्ठ नेते यूसुफ रजा गिलानी यांनी इस्लमाबादमधून विजय मिळवला आहे. गिलानी यांना १६९ मतं मिळाली आहेत. गिलानी यांचा हा विजय पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआय पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गिलानी यांनी या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्रीमंडळाचे सदस्य असणारे मंत्री डॉक्टर शेख यांना पराभूत केलं आहे. मात्र या पराभवाबरोबरच पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इम्रान यांच्या मंत्रीमंडळातील नेत्याचाच पराभव झाल्याने पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट (पीडीएम) पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी इम्रान खान सरकारवर टीका केलीय. तसेच मरियम यांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली आहे. ११ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये या अविश्वास प्रस्तावासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र मरियम यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी सीनेट निवडणुकीत देशाच्या अर्थमंत्र्यांचा पराभव झाल्यानंतर संसदेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

आणखी वाचा- मोदी सत्तेत आल्यापासून भारतामधील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

इम्रान यांचे निकटवर्तीय असणाऱ्या अब्दुल हफीज शेख यांना बुधवारी लागलेल्या सीनेट निवडणुकींच्या निकालामध्ये मोठा धक्का बसला. माजी पंतप्रधान असणाऱ्या गिलानी यांनी शेख यांचा पराभव केला. इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचे अध्यक्षही आहेत. इम्रान खान यांनी आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याच्या विजयासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र गिलानी यांच्या पीपीपीने विरोधी पक्षातील पीडीएमच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढली आणि त्यामध्ये विजय मिळवला. गिलानी यांच्या विजयामुळे विरोधी पक्षांपासून ते स्वपक्षीयांपर्यंत सर्वच स्तरातून इम्रान खान यांच्यावर टीका केली जात आहे. हा पराभव स्वीकारुन इम्रान यांनी पंतप्रधानपद सोडावे अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे.

या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पंतप्रधानांनी बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. पक्षाची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कुरेशी म्हणाले.