मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. भारतावर अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे सज्ज असल्याची धमकी हाफिजने दिली आहे. तो म्हणाला की, भारताने पाकवर हल्ला केला, तर आम्ही शांत बसणार नाही. भारतावर न्यूक्लिअर ड्रोनद्वारे अणुहल्ला करण्यात येईल. पाकिस्तानला आता १९७१ सालचा देश समजू नका. आमची शक्ती आता वाढली असून कोणत्याही प्रकरच्या हल्ल्याचा सडेतोड उत्तर देण्याची तयारी असल्याचे हाफीज म्हणाला. याशिवाय, संपूर्ण भारताला नष्ट करण्यासाठी आमच्याकडे मुबलक न्यूक्लिअर ड्रोन असल्याचेही तो म्हणाला.

दरम्यान, भारताने हाफिज सईदविरोधात याआधीच अनेक पुरावे पाकिस्तानला देऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शिवाय, अमेरिकेनेही हाफिजवर एक कोटी डॉलरचे बक्षिस ठेवले आहे.