पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर पाकिस्तान एकाकी पडत चालला आहे. भारताच्या इशाऱ्याने बिथरलेला पाकिस्तान लष्करी कारवाई टाळण्यासाठी जोरदार हात-पाय मारत आहे. संयुक्त राष्ट्रात धाव घेतल्यानंतर भारताची समजूत घालण्यासाठी पडद्याआडून पाकिस्तानच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानी वर्तमानपत्रानेच हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचे जवळचे मित्र आणि काही प्रभावशाली देशांच्या मदतीने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांच्या हस्तक्षेपाची शक्यता कमी असल्याने पाकिस्तान आता सौदी अरेबिया काही तरी करेल अशी अपेक्षा बाळगून आहे. नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर आलेले सौदी अरेबियाचे राजपूत्र महंमद बिन सलमान भारत दौऱ्यावर आहेत. ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा विशेष संदेश पंतप्रधान मोदींना देतील असे 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने पाकिस्तान सरकारमधील विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्याच्या तपासात पाकिस्तान सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे. इम्रान खान यांच्यावतीने महंमद बिन सलमान मोदींना हा संदेश देतील असे या वृत्तात म्हटले आहे. मागच्या आठवडयात पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहोम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला. यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून काहीही करुन पाकिस्तानला धडा शिकवा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.