प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी लष्कराची वळवळ सुरूच आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराने पूँछ भागातील भारतीय लष्करावर जोरदार गोळीबार केला. तब्बल सात हजार फैरी पाकिस्तानकडून झाडण्यात आल्या तसेच तोफांचाही भडीमार करण्यात आला. मात्र, भारताने त्यास चोख प्रत्युत्तर दिले.
पूँछमधील सरला या गस्तीस्थळावर घुसखोरी करत पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. शुक्रवारी रात्री पुन्हा तीच आगळीक करत पाकिस्तानी लष्कराने दुर्ग बटालियन या भागात जोरदार गोळीबार सुरू केला. शनिवारी पहाटे साडेचापर्यंत चाललेल्या या गोळीबारादरम्यान पाकिस्तानने सात हजार फैरी झाडल्या व तोफगोळ्यांचा मारा केला. भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत साडेचार हजार फैरी झाडल्या.
तीनही सेनादलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांशी नियमितपणे संवाद साधणे गरजेचे आहे.मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्याची आपली क्षमता असून त्यासाठी सीमा ओलांडण्याचीही गरज नाही. पाकिस्तानबाबत आपण नरमाईची भूमिका घेतो. केवळ गुळमुळीत प्रतिक्रिया देण्यापेक्षा भारताने आक्रमक व वर्चस्ववादी राहिले पाहिजे.
अनिल टिपणीस, माजी हवाई दल प्रमुख
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 11, 2013 1:35 am