पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी युद्धबंदी कराराचा भंग करून जम्मूतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून निष्कारण गोळीबार केला. भारतीय सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
भारताकडून कुठलीही आगळीक झालेली नसताना पाकिस्तानी सैन्याने सकाळी सव्वानऊ वाजेपासून पूंछ जिल्ह्य़ातील सावजियान भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून अंदाधुंद गोळीबार केल्याचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ले. कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. हा गोळीबार पाच ते दहा मिनिटे चालला आणि त्यात भारतीय बाजूकडील कुणीही मृत किंवा जखमी झाले नाही.  पाकिस्तानी सैन्य सकाळपासून लहान-लहान स्वयंचलित शस्त्रांनी थोडय़ा-थोडय़ा वेळाने गोळीबार करत असल्याने भारतीय सैन्याला प्रत्युत्तर देणे भाग पडल्याचे ते म्हणाले पाकिस्तानी सैन्याच्या या आगळीकीला आमच्या सैनिकांनीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले असल्याचे मेहता यांनी सांगितले.