पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचा भंग केला. आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारताच्या १५ चौक्यांसह जम्मू जिल्ह्य़ातील काही गावांवर गोळीबार, तसेच उखळी तोफांचा जोरदार मारा केला. यामुळे काही घरांचे नुकसान झाले. गोळीबारात काही पाळीव जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ चौक्यांवर तुफानी गोळीबार केला, तसेच अर्निया आणि आर एस पुरा पट्टय़ातील काही खेडय़ांच्या दिशेने रविवारी मध्यरात्रीपासून उखळी तोफांचा मारा केल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली.
पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांत शस्त्रसंधीचा वारंवार भंग केला जात आहे आणि ही गंभीर बाब आहे. याबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा मुद्दा पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातला आह़े  याबाबत त्यांनी पाकिस्तानला खडसावले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.