पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर भारताच्या दिशेने गोळीबार केला. पूंछ जिल्ह्यामधील नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या या गोळीबाराला सीमेवरील भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुमारे २० मिनिटे गोळ्यांच्या फेरी झडत होत्या, अशी माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल आर. के. पालटा यांनी दिली. 
गोळीबारामध्ये एकही भारतीय सैनिक जखमी झालेला नाही. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबारास सुरुवात झाली. सुरुवातीला गोळीबाराचे प्रमाण कमी होते. काही वेळाने गोळीबाराचे प्रमाण वाढल्यानंतर त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जुलै महिन्यात चौथ्यांदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.