भारत-पाक चर्चेत वितुष्ट आणणाऱ्या पठाणकोट हल्ल्यासंदर्भातील चौकशी पाकिस्तान लवकरच पूर्ण करेल, असे नवाज शरीफ यांनी सांगितले. ते शनिवारी लाहोर येथे पत्रकारांशी बोलत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीनंतर भारत-पाक चर्चा अगदी योग्य मार्गावर होती. मात्र, पठाणकोट हल्ल्यामुळे या चर्चेत खंड पडल्याबद्दल नवाज शरीफ यांनी दु:ख व्यक्त केले.
पाकिस्तान पठाणकोट हल्ल्याचा छडा लावण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाईल, असे वचन शरीफ यांनी दिले. या हल्ल्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर झाला असेल तर त्याबाबतचे सत्य पुढे आणणे आमची जबाबदारी आहे. आम्ही हे करू आणि सुरू असलेली चौकशी     लवकरात लवकर संपवू असे शरीफ यांनी म्हटले. दहशतवाद्यांचा सातत्याने पराभव होत असून त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना आहे. त्यामुळे आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी अशाप्रकारची कृत्ये करत असल्याचे शरीफ यांनी सांगितले.