खोट बोलण्याची सवय असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या स्वभावाप्रमाणे दगा दिला आहे. रविवारी भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर जम्मू-काश्मीरच्या अर्णिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय चौक्यांवर तोफगोळयांचा वर्षाव केला.

भारतानेही पाकिस्तानच्या या आगळीकीला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने अर्णिया सेक्टरमध्ये गोळीबार सुरु केला आहे. पाकिस्तानने सीमारेषेवरील गावांना लक्ष्य केले असून पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफांचा मारा सुरु आहे. पाकिस्तानने अचानक केलेल्या या हल्ल्यामध्ये अनेक गावकरी अडकून पडले आहेत. पाकिस्तानच्या या गोळीबारात अद्यापपर्यंत तरी कोणीही जखमी झालेले नाही.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु होते. भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला त्याचा भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यानंतर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवानासह पाच नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर बीएसएफने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली होती. बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असलेली पाकिस्तानी चौकीच उडवून दिली.

बीएसएफच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी (दि. २० मे) फोन करून बीएसएफला गोळीबार रोखण्याची विनंती केली. भारताच्या त्वरीत आणि चोख प्रत्युत्तरामुळे धास्तावलेल्या पाक रेंजर्सला फोन करावा लागला. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबाराला बीएसएफकडून मागील तीन दिवसांपासून योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे. नेमक्या ठिकाणी गोळीबार केला जात असल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सचे मोठे नुकसान होत होते.