विरोध पक्षाच्या सदस्यांची घोषणाबाजी आणि गोंधळाचे वातावरण यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ठप्प झाले. तेलंगणा, महागाई आणि मुझफ्फरनगरमधील पुनर्वसन शिबिरात झालेला बालकांचा मृत्यू या विषयांवरून विविध विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळेच लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही आणि ते दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
विरोधकांच्या गोंधळामुळेच आंध्र प्रदेशमधील सहा खासदारांनी सरकारविरोधात दिलेला अविश्वासाचा प्रस्तावही लोकसभेत चर्चेला येऊ शकलेला नाही. दरम्यान, गोंधळाच्या परिस्थितीच सरकारने रेल्वे आणि सर्वसाधारण पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या. गेल्या तीन दिवसांप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वेळा तर राज्यसभेचे तीन वेळा तहकूब करावे लागले. सदस्य ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.