सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील मतभेदांमुळे संसदेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या व्यत्ययाबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी चिंता व्यक्त केली. अनेकदा हे मतभेद किरकोळ स्वरूपाचे असतात आणि त्यातून निश्चितपणे मार्ग निघू शकतो, असे ते म्हणाले.
येथे झालेल्या एन. के. पी. साळवे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नसल्याने संसदेचे कामकाज बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. राज्याराज्यातील विधिमंडळांच्या कामकाजातही या कारणामुळे व्यत्यय येताना दिसतो. या व्यत्ययांचे प्रमाण इतके आहे की तो एक प्रघात बनू पाहात आहे, असे ते म्हणाले. लोकसभेत सभागृह नेता या नात्याने काम करताना या वाईट प्रथेबाबत बरेच चिंतन केले असता यातून मार्ग काढणे कठीण नाही, असे माझ्या लक्षात आले.