आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याला द्वेषपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या लखनौच्या पासपोर्ट अधिकाऱ्यानं आपली काहीही चूक झाली नसल्याचा व आपण केवळ नियमांची अमलबजावणी करत असल्याचा दावा केला आहे. विकास मिश्रा असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याची लखनौमधून गोरखपूरला बदली करण्यात आली आहे. हिंदू पत्नी व मुस्लीम पती असलेल्या या दांपत्याने मिश्राविरोधात तक्रार केली, ट्विट केलं आणि देशभरात यावर उलटसुलट चर्चा घडल्या. परराष्ट्र खात्यानं याची दखल घेत मिश्रांची बदली केली तसेच या दांपत्याला पासपोर्टही दिला.

मात्र आता मिश्रा यांच्या सांगण्यानुसार पत्नीचे नाव निकाहनाम्यावर वेगळे होते व अन्य कागदपत्रांमध्ये वेगळे होते त्यामुळे मी जास्त पुरावे देण्याची मागणी केली. लग्नानंतर महिलेनं नाव बदललं पाहिजे किंवा तिच्या पतीनं हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे असं आपण बोललेलोच नाही असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे. तन्वी सेठ व अनास सिद्दिकी या जोडप्याच्या सांगण्यानुसार मिश्रा यांनी असं म्हटलं की, “माझ्या फाइलमध्ये मी मुस्लीम व्यक्तिशी लग्न करूनही माहेरचं नाव ठेवल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.” त्याचवेळी लग्नानंतर नाव बदलायला हवं असा सल्लाही मिश्रांनी दिल्याचं सेठ म्हणाल्या. त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे या घटनेची ट्लिट करून तक्रारही केली.

मिश्रा यांनी ही चुकीची माहिती असल्याचं आज सांगितलं आहे. निकाहमान्यावर शाझिया अनास असं नाव होतं, परंतु कागदपत्रं भरताना तिनं नाव बदललं नसल्याचं सांगितलं. मी तिला निकाहनाम्यावरील नाव पासपोर्टवर देण्यास सांगितलं ज्यास तिनं नकार दिला, परिणामी मी तिला वरिष्ठांकडे पाठवल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. कुठल्याही प्रकारे धार्मिक भेदभाव आपण केला नसल्याचे ते म्हणाले. मी स्वत: आंतरजातीय विवाह केला असून सर्व धर्मीयांचा मी आदर करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मिश्रा यांची बदली करण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली आहे. लखनौ येथील कार्यालयाकडूनही परराष्ट्र खात्याने अहवाल मागवला आहे.

हा सगळा प्रकार बुधवारी तनवी सेठ यांनी ट्विट केल्यानंतर सुरू झाला. अनासचं नाव घेऊन चारचौघांदेखत आपला अपमान केल्याचा आरोप तन्वी यांनी मिश्रा यांच्याविरोधात केला आहे. अनास यांचा पासपोर्ट नूतनीकरण करायचा असल्यास त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा असं मिश्रा म्हणाल्याचं तनवी ट्विटमध्ये म्हणाल्या.