भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांवरून पक्षाचे नेते अरूण जेटली यांनी बिहारमधील नितीशकुमार यांच्या सरकारवर निशाणा साधला. सभेच्या ठिकाणी स्फोट होण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलेला असतानाही त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली नव्हती, असा आरोप जेटली यांनी केला.
ते म्हणाले, गुप्तचर यंत्रणांनी सभेच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली असताना, तिथे सुरक्षेचे कोणते उपाय योजले होते, याची माहिती बिहार सरकारने द्यावी. स्फोट झाल्यानंतरही बिहार सरकारने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. स्फोट होत होते, त्यावेळी काय करायचे, हे आम्हाला सुचत नव्हते. राज्य सरकारचा कोणताही वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित नव्हता, असेही जेटली म्हणाले.
बिहार सरकारने मतांचा विचार करणे सोडून आपल्या जबाबदाऱया पूर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.