देशातील लूटमार सरकार संपुष्टात आल्याने जनता आनंदी असल्याचे प्रत्युत्तर भाजप नेत्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले आहे. मोदी सरकार ‘सूट बूट की सरकार’ असल्याची टीका राहुल गांधी केली होती. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भाजपचे प्रवक्ते संमित पात्रा यांनी देशातील जनता ‘लूटमार सरकार’च्या जाचातून मुक्त झाल्याने आनंदी असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने राहुल गांधी यांनी देऊ केलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी असल्याचे पात्रा यावेळी म्हणाले. तसेच देशातील जनता मोदी सरकारने यशस्वी कारभाराचे एक वर्षपूर्ण केल्याबद्दल आणि लूटमार सरकारपासून मुक्त झाल्याने आनंदी असल्याचा टोला पात्रा यांनी लगावला.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांना फॅशन आयकॉन असल्याचे संबोधून राहुल गांधी यांनी सूटबूट की सरकारला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच मोदी सरकारने यापुढेही असाच दिखावूपणा कायम ठेवला तर देशातील गरीब जनता सरकारला पाच वर्ष पूर्ण देखील करू देणार नाही. त्यामुळे भाषणबाजी बंद करून कामाला लागा, असा सल्ला देखील राहुल यांनी मोदी सरकारला दिला होता.