बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी, तेजप्रताप यादव यांनी ‘आझादी पत्र’ अभियान सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) तेजप्रताप यादव यांनी आपल्याच पक्षाच्या (राजद) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांची कानउघडणी केल्याचे समोर आले आहे.

अशाप्रकारच्या लोकांमुळेच माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे. हीच लोकं पक्षाला कमकुवत करत आहेत. असा तेजप्रताप यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यावर आरोप केला आहे. राजदच्या कार्यालयात यावेळी बराचर गोंधळ झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

यावेळी तेजप्रताप म्हणाले, मी कुणाला घाबरत नाही, जे होतं ते थेट तोंडावर बोलतो. मी पक्षाच्या कार्यालयात पोहचलो पण जगदानंद सिंह त्यांच्याच कक्षात बसून होते. त्यांनी आझादी पत्र देखील लिहिले नाही. माझ्या वडिलांची प्रकृती खराब होण्यामागे अशा प्रकारचीच लोकं कारणीभूत आहेत.

लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी तेजप्रताप यांचे ‘आझादी पत्र’ अभियान

तसेच, यावर जगदानंद यांनी म्हटले की, मला याबाबत काहीच माहिती नाही, जर असं काही असेल तर हा घरातील मुद्दा आहे, आम्ही तो सोडवू.
तेजप्रताप यांनी राष्ट्रपतींकडे देखील लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेची मागणी केलेली आहे. याशिवाय, बिहारमधील जनतेला देखील या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.