केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असं गडकरी म्हणाले आहेत. मात्र गडकरींनी आगदी आपल्या खास शैलीमध्ये टोलसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलं.

“एसी हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर भाडं द्याव लागणार. फुकटं करायचं असेल तर मैदानात बसूनही लग्न लावता येतं,” असं गडकरींनी टोलसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. एक्सप्रेसवेवरुन प्रवास करताना टोलच्या माध्यमातून अधिक पैसे मोजावे लागतात अशा स्वरुपाचा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला होता. एक्सप्रेस-वेमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणांमध्ये वाचतो असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. आज दिल्लीहून मुंबईला जायला एका ट्रकला ४८ तास लागतात एक्सप्रेस-वेमुळे हा वेळ १८ तासांवर येणार असल्याचं गडकरी म्हणाले.

नक्की पाहा >> Nitin Gadkari in Action Mode: जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस-वेची पाहणी करण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने पोहचले

तसेच एक्सप्रेस-वे अधिक वेगवान असल्याने इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होते असं मत गडकरींनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना गडकरींनी जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे भारतामध्ये उभारला जात असून त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भात बोलताना म्हटलं आहे. या एक्सप्रेस-वेमुळे दिल्लीहून अवघ्या साडेबारा तासांमध्ये मुंबईला पोहचता येईल असंही गडकरींनी सांगितलं. या एक्सप्रेस-वेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्स वापरले जाणार आहे. हा मार्ग सहा राज्यांमधून जाणार असून एअर अॅम्ब्युलन्स म्हणजेच हवाई मार्गाने रुग्णांची ने आण करण्यासाठी वापर करता येईल या दर्जाचा हा मार्ग असेल असं गडकरी म्हणाले.,

गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत जाऊन दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाची पहाणीसुद्धा केली. यावेळी गडकरी हे या ठिकाणी हेलिकॉप्टरने पोहचले.

यावेळी गडकरींनी २०२३-२४ पर्यंत आम्ही अडीच हजार किलोमीटरचे रस्ते राजस्थानमध्ये उभारणार असल्याचं गडकरींनी राजस्थानमधील अन्य एका कार्यक्रमामध्ये सांगितलं. या प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी रुपये इतका असणार आहे.

२०१८ रोजी गडकरींनी पहिल्यांना मुंबई- दिल्ली एक्सप्रेस-वेची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी चंबळ एक्सप्रेस वे तयार करुन तो मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेला जोडणार असल्याचंही सांगितलं होतं. या एक्सप्रेस-वेमुळे मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम किंवा आदिवासी भाग जोडले जातील, त्यामुळे या भागांचा मोठा विकास होईल असंही गडकरी म्हणाले होते. नवीन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल आणि तुलनेने कमी विकसित असलेल्या प्रदेशातून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली होती.