राफेल घोटाळयात पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही वाचवू शकत नाही. मोदींनी अनिल अंबानींनी व्यक्तीगत फायदा पोहोचवला या आपल्या आरोपांचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला आहे. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना राफेल प्रकरणाची चौकशी करायची होती. म्हणून त्यांना मध्यरात्री तात्काळ पदावरुन हटवले. लोकसभेत मोदींनी चर्चेपासून पळ काढाला असा आरोप राहुल यांनी केला.

फ्रान्सकडून राफेल फायटर विमान मिळण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डासू एव्हिएशनला २० हजार कोटी रुपये दिले. पण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची देणी द्यायला ते नकार देतात या शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

राफेल विमान मिळण्याआधीच पंतप्रधान मोदींनी डासूला २० हजार कोटी दिले पण एचएएलला १५,७०० कोटी रुपये द्यायला ते नकार देतात. त्यामुळे एचएएलला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एक हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागते असे राहुल गांधी म्हणाले.

पैसे न देऊन एचएएलला कमकुवत करण्याची सरकारची रणनिती आहे. एचएएलच्या रुपाने भारताची रणनितीक क्षमता नष्ट करुन त्यांना अनिल अंबानींना गिफ्ट द्यायचे आहे. हाच त्यांचा कट असून जो आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहोत असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

काल राहुल यांनी राफेल मुद्यावरुन निर्मला सीतारमन यांच्यावर टीका केली. निर्मला सीतारमन या राफेल करारावरुन संसदेत खोट्या बोलत असून त्या संरक्षण मंत्री नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या आहेत, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राफेल करारात निर्मला सीतारमन यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता की नाही, याचे सरकारने आधी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मोदींनी राफेलबाबत संसदेत माझ्याशी १५ मिनिटे चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी पुन्हा एकदा दिले.