‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’अंतर्गत सातवा हफ्ता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअतंर्गत शेतकऱ्यांना वर्षभराच्या कालावमधीमध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये पाठवले जातात. मात्र आता या योजनेमध्ये फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक ठिकाणी या योजनेसाठी पात्र नसणाऱ्या व्यक्तींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी न करणाऱ्यांच्या खात्यांमध्येही पैसे जामा झाल्याची प्रकरणं आता समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता थेट आधारकार्डांसंदर्भातील सर्व कामकाज पाहणाऱ्या युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी प्रमुख राम सेवक शर्मा यांच्या नावाने ही फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार शर्मा यांच्या नावाने  सुरु करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर एका वर्षामध्ये तीनवेळा पीएम सन्मान निधी अंतर्गत एकूण सहा हजार रुपये पाठवण्यात आलेत. शर्मा यांनी या योजनेसाठी आपलं नाव नोंदवलेलं नाही तरीही त्यांचा खाते क्रमांक या योजनेअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. “यासाठी राज्य सरकार जबाबदार असून त्यांनी पैसे पाठवण्यापूर्वी खाते क्रमांकाशी संबंधित कोणतीही तपासणी केली नाही,” असा दावा शर्मा यांनी केला आहे.

शर्मा यांनी पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत माझ्या खात्यावर दोन हजार रुपयांचा निधी तीन हफ्त्यांमध्ये जमा झाल्याची माहिती दिली. शर्मा यांच्या नावाने असणाऱ्या ज्या खात्यामध्ये हे पैसे जामा झालेत ते खातं ८ जानेवारी २०२० रोजी सुरु करण्यात आलेल. हे खातं नऊ महिने सुरु राहिलं आणि नंतर २४ सप्टेंबरला ते बंद करण्यात आलं. या खात्यानुसार शर्मा यांचं नाव उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणून नोंदणवण्यात आलेलं. मनी कंट्रोलनेही द क्विंटच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”

शर्मा यांना आपल्या नावाने खातं सुरु करण्यात आलं आहे हे समजलं तेव्हा त्यांनीच यासंदर्भात बँकेला माहिती दिली. मात्र त्यावर बँकेकडून काहीही उत्तर आलं नाही. मात्र बँकेने शर्मा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेलं खातं बंद केलं. मी या योजनेसाठी पात्र नसल्याचं शर्मांनी स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी अभिनेता हनुमान, आयएसआयचा हेर महबूब अख्तर अभिनेता रितेश देखमुखच्या नावंही शेतकरी म्हणून वापरुन खाती उघडण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या व्यक्तींचे आधारकार्ड सार्वजनिक स्तावर उपलब्ध आहेत त्यांच्या नावाने ही फसवणूक केली जाते. हनुमान यांच्या खात्यावर सहा हजार, अख्तरच्या खात्यावर चार हजार तर रितेशच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्यात आले होते.