पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, तसेच खासदारांच्या वार्षिक वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सर्व राज्यपाल यांनी स्वत:हून वार्षिक ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीनंतर ‘हॉटस्पॉट’चे विभाग वगळून उर्वरित विभागांना कसे सुरू करता येईल, याचा आराखडा करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक झाली. ही बैठक पहिल्यांदाच दूरचित्रसंवादाद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठवण्याबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय जाहीर केला नसल्याने अनिश्चितता कायम आहे. यासंदर्भात राष्ट्रहिताचा विचार करून निर्णय घेतला जाईल आणि तो जनतेला योग्य वेळी कळवला जाईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तर प्रदेशमध्ये टाळेबंदी उठवली जाऊ शकते असे सूचित केले होते. मात्र, पंजाब आणि महाराष्ट्राने टाळेबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. १४ एप्रिलनंतर काय? देशभरातील २१ दिवसांच्या टाळेबंदीचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत असल्याने ‘हॉटस्पॉट’चे विभाग वगळून उर्वरित भागांना टाळेबंदीतून कसे वगळता येईल, यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी आराखडा तयार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. लढाई दीर्घ पल्ल्याची : नवी दिल्ली : करोनाविरोधात दीर्घ लढाई लढावी लागेल. या महासाथीविरोधात विजय मिळेपर्यंत आपल्याला न थकता अखंड काम करावे लागेल. धैर्य आणि निश्चय आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जाईल, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. पंतप्रधानांनी करोनाविरोधात कार्यकर्त्यांना पाचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा सल्लाही दिला. एकात्मिक फंडात वेतन.. पगारातील कपातीचा निर्णय बारा महिन्यांसाठी (आर्थिक वर्ष २०२०-२१) असून त्यासंदर्भातील अध्यादेशाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. खासदार निधीतून होणाऱ्या योजनाही पुढील दोन वर्षांसाठी (२०२०-२१ व २०२१-२२) स्थगित करण्यात आल्या आहेत. ७,९०० कोटींचा खासदार निधी तसेच, ३० टक्के वेतन सरकारच्या एकात्मिक फंडात जमा केले जाणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.