कर्नाटकमध्ये सरकार आल्यानंतर दहा दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं होत. पण, सहा महिने लोटले तरी एक हजार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांना खोटं बोलत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. रायबरेलीत आयोजित सभेत मोदी बोलत होते.

काँग्रेसच्या राज्यात ना जवानांची गोष्ट केली जात होती ना शेतकऱ्यांची. मात्र भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी धोरण तयार केली. त्याची अंमलबजावणी केली. एमएसपीच्या एका निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना ६० हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने स्वामीनाथ आयोगाचा अहवाल लागू केला. खरीप आणि रब्बीतील २२ पिकाचे भाव निश्चित केले आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या काळात शेतकरी विम्याचा हफ्ता १५ टक्के घेतला जात होता. भाजप सरकारने पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ ते ५ टक्केच हफ्ता घेतला.तर ३३ हजार कोटी रुपये पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिले. ७० वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा विचार जर कोणत्या सरकारने केला असेल तर तो भाजप सरकारने केला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा रायबरेलीमध्ये आले आहेत. येथे अनेक विकास कामाचे लोकार्पण केले. जनतेला संबोधित करण्यापूर्वी मोदी यांनी हमसफर कोचला हिरवा झेंडा दाखवला. मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच रॅली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून पंतप्रधान आपल्या २०१९ च्या निवडणूकीच्या रणसंग्रामाला सुरूवात करण्याची शक्यता आहे. रायबरेलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकास कामांचा शुभारंभ करून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला. प्रयागराजमध्ये होणाऱ्या जनसभेमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभा २०१९ निवडणुकीसंदर्भात मोठा संदेश देणार असल्याचं म्हटलं जात आहे. येथे पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. ३०० प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून यामध्ये विमानतळ आणि ७ उड्डाणपुलांचा समावेश आहे.